Monday, September 13, 2010

दिवस

दिवस



मंद निशा
उगवली उषा
दाही दिशा
फुलल्या आशा

अंगणो अंगणी
सडा टाकला
गायली गाणी
प्राजक्त फुलला

रहाटा रहाटा
घागर भर
जीवन माझे
जिवनाने भर

सूर्या सूर्या
अर्घ्य घे
तेज तुझे
मला दे

तुळशी तुळशी
पाणी घे
मला तुझे
सौभाग्य दे

चुली चुली
लिंपण लावते
कुंकवाचे बोट
तुला लावते

गायी गा्यी
चारा घ्या
वासराला
दूध द्या

धन्या धन्या
जागा हो
शेताची हाक
ऐकली काहो

दिसा दिसा
वाढत जाय
घरात माझ्या
लक्ष्मी जनलीहाय

बाळ गोपाल
झोळीत निजला
सुखाचा क्षण
हळूच टिपला

झाले सुरु
जीवन गाणे
देवकृपेने
काही न उणे

मुक्ता
10/2/2009

विरह.

विरह.



पूनवेला तडागी फुलले पद्मकमळांचे कळे
आज आकाशी पुन्ह: उगवले नक्षत्रांचे मळे.

रान जळाले,पेटला वणवा , तव स्मृतींचा
धावत सुटलो,पदर उलगडीत मी काळाचा.

नाजुक पावले तुझी उमटली माझ्या हृदयावरी
दूर दूर, सूर पूर, पुन्हा उमलवली मंद पावरी

सखे,मिटवुनी ये आता त्या विरह कळ्याना
कायमचे मालवुनी टाक तू गतकाळ कळ्यांना

आर्तते बोलाविते माझी ही सुरेल पावरी
ये ना ग प्रिये लगबगे माझे साजण बावरी

लागतील चंद्र झळा प्रिये तुझ्या गालांना
पदर ओढून हळुच ये विरल्या वाटांना

गुंफुन टाकु चंद्रकलांना, बांधु यमुनेवरी झुला
नक्षत्रांची एक चांदणी करुनी देईन तुला.

नयनी तुझ्या पेरेन मी लाख सुरांचे थवे
मंजुळ गान गातच राहू रोज नव नवे



मथुरेला कृष्ण आल्यावरही कधी कधी गोकुळाची त्याला ओढ लागायची आणि त्याचे मन परत राधेसाठी झुरायचे
Mukta Pathak Sharma
६.२.२००९
सिंगापूर

घरटे

घरट्यातुनी उडाले

पक्षी पंख फुटलेले

मागे रिक्त उरलेले

घर एकटे एकटे



माय वडिलांची हाक

बोलाविते घराकडे

प्रतिक्षेत डोळे आर्त

लागलेले वाटेकडे

मागे वळा पाखरांनो

घर एकटे एकटे



अंगणात वृक्ष दोन

कसेबसे उरलेले

गळलेली पर्णपाती

भुईवर झुकलेले

सावराया मागे फिरा

घर एकटे एकटे



काळजाला तडे जाती

गळे सदा छप्परही

ममत्व गाभुळलेले

डोकावते खिडकीशी

परत या उभाराया

घर एकटे एकटे



मुक्ता शर्मा
13/3/2009

पलाश

उंच उडोनिया जावे,

घ्यावे कवेत आकाश.

अंगावरी माखवावे

निल रंगास रंगास.



जरा घ्यावे हेलकावे.

वा-या संगे गावे गाणे.

गाण्यातही आभाळाला,

वा-यासंगे डोलवावे.

अशा अमूर्त क्षणाचा

स्पर्श अंगास अंगास.



सारे रंग चैतन्याचे

पेरेलेले आकाशात.

जरा बिजे रुजवावी

ऋतुमयी धरणीत.

आतुरले मन तिचे

नव्या संगास संगास.



नवा दिनु उगवला

नवे लेवून लावण्य.

हिरवाईच्या साथीला

आला धावून प्रकाश

धरत्रीच्या अंगणात

जन्म अंशास अंशास.



सा-या धरेवरी आली

एक आनंदाची लाट

भेटे धरणीला आज

ऋतु वसंताची वाट

तिच्या अंगी मोहरला

रंग पलाश पलाश



मुक्ता शर्मा
31/3/2009

Sunday, September 12, 2010

रिंगण

रिंगण


टिपला सूर्य

भाळी रोवला

मदन सोहळा

भिने रोमारोमाती.


पेरला चांद

उगवला मळा

काळाची कळा

फिरे अवतीभवती


भंगला खेळ

संपला श्वास

विश्वाचा व्यास

फिरे परिघाभोवती

२६/५/२००९


ह्याच कवितेला वेगळे वळण


भंगला खेळ

संपला श्वास

विश्वाचा व्यास

भुलला परिघाभोवती


मुक्ता पाठक शर्मा
१५/८/२००९

हाक

हाक



विश्वाच्या व्यापकतेला ही क्षुद्राची हाक रे !

अथांग त्या दर्याला भुलली ही नाव रे !

भाळले त्या रंगाला अवनीचे ते अंग हे !

निळ्या गगनाला अजुनही अनंताचे खूळ रे !



कात टाकली, विज झेलली,विष प्याला रिचवला.

आसक्तीच्या मुळावरी अनासक्त हा रुजला.

फुलल्या दिशा,फुलल्या कला,आभाळाला भिडल्या

कणाकणातूनी अणु-रेणूतुनी विश्वरुपी जाहल्या.



मुक्ता पाठक शर्मा
३० मार्च २०१०

सिकंदर

सिकंदर



सकाळी उठता,
भगव्या सन्यस्त उषेची पूजा करता,

स्मरली कालची रात्र,

कळोखाच्या सागरात

फेकलेला दगड,

तळाशीच जाऊन निपचीत पडला असेल.

काळोखाचे आवरण घेऊन

काळोखातच हरवला असेल.

भगव्या उषेला काय खबर.

तिही अदृष्य होणार,

प्रखरता आल्यावर अरुणीची!!

त्याला कोणाची खबर,

"अंधाराचे साम्राज्य नष्ट करायला

निघालेला तो एक सिकंदर !"

- बंदीवान "पुरु" समोर हरणारा

......सपशेल हरणारा


मुक्ता पाठक
११.६.१९९९

गाथा

गाथा


रुधिराचा उष्ण घोट,

गटा गटा प्यायले.........

तेव्ह कुठे आतली आग,थोडीशीच शांत झाली

....हिमालयासारखी.


आणि मनाला जाणिव झाली,

.......समुद्राच्या रितेपणाची,

.......हिमालयाच्या थिटेपणाची.


आणि आपसुकच उमजली मला,

माझ्यातल्या उधाण वादळाची

बेफान लाटांची.........गाथा.


म्हणुनच म्हणते,

उगाच शांत दिसणा-या मला,

विचलीत करु नका...

हा सावधानतेचा इशाराच समजा.

....नाहितर

....जे आहे तेही गमवाल

.....मग विनाकारण दोष द्याल........माझ्या विध्वंसकारी रुपाला

..........................................आत दडलेल्या जगन्मातेला.
 
 
मुक्ता पाठक शर्मा
३१/३/२००८

Thursday, September 9, 2010

नव कल्लोळ

नव कल्लोळ




कधीच विरघळल्या,निखळत्या वेदना.

नव्या आर्तस्वरासाठी तू गगनाला चाळतो?

*

काय सांगतील भेद ते तारे?

त्याना तरी काय ठाव आहे.

काय बोलेल तो चंद्र खुळा?

बोलण्यापरी त्या जवळी काय उरले आहे.

आभाळावरी कोणाची पावले रुतलेली,

येथीही ह्या भेदाचे गुढ रहस्य आहे.

*

सनातन,अचल स्वर्ग काय कामाचा?

तृषेच्या आगीत जळूनी पिघळतही नाही?

आनंदणे ज्यांना माहीतची नाही स्वच्छंदाचे

तो कल्पवृक्षही त्याना नरकासमान आहे.

*

शोधात प्रकाशाच्या चालला अंधाराच्या दिशेने.

मार्गात दिसतील कसे अनुभूतींचे नजारे?

एक घाव , तुकडे बंधनांचे,तराणे रोशणीचे.

तरी शोधात त्याच्या कुठे भटकत आहे.

*

गगनात नाही उरले काही,हे वास्तवाचे मर्म आहे.

नव्या स्वरांनी भरला कोष, तरी श्रवण द्वारे लुप्त आहे.

घडा फोडून वाहीली ती अमृत धारा.

तरी तृषार्तापरी नदीचा शोध आहे.

*

नवस्वराच्या साधका ! तलातल तोडूनी जा.

पावले पडतील ज्यावरी,निशाण तिथे सोडूनी जा.

नव्या झंकाराची दुनिया संपते कुठवरी?

तोच काही जाणतो,जो परिघाला मानत नाही.

*

काय आहे तिथे,जिथे कारंजे उधाणलेले,

जराशी भिजली माती की फुटती कोंब अंकुरलेले.

बरसतो जो गगनातुनी तेच जमा मही मध्ये,

उतरण्या अतलात अजुनही विचार विचलित आहे.

*

ह्रुदय जलात सिमटूनी,त्याचा ठाव घे,

रसाच्या तालात उतरुनी अवगाहन तर घे.

सरोवर सोडूनी,थेंब प्राशन मोदात रंगलेल्या मूढा,

गगनाच्या फुलावरी शायक वृथा संधानता आहे.



अवगाहन= स्नान किवा एकरुप होणे

शायक= बाण

मुक्ता पाठक शर्मा
२५/५/२००९

Wednesday, September 8, 2010

चरण फुल

चरण फुल



............प्राण तुझ्या चरणांचे फुल

मजला कांचन झाली तुझ्या चरणांची ही

...................धूळ



.......आले होते ,जाणेही आले

,,,,,,परतुनी येणे,दु:ख कशाचे ?

परत एकदा दृष्टीकरांनी पदचिन्हांची रेशा

...................चुंबिल

......प्राण तुझ्या चरणांचे फुल



.........वाक्य अर्थाचा होवो प्रत्याशी

.........गीत शब्दांचे कधी अभिलाषी?

अंतरात परागासम सजली गत स्मृतींची

..................आशा धूळ

............प्राण तुझ्या चरणांचे फुल





मुक्ता

५.२.२००९

Tuesday, September 7, 2010

संपाति

संपाति


.
तुला मी कधीच दोष दिला नाही.


आजही नाही, कालही नाही

आणि उद्याही देणार नाही.

सा-या चूकांचे खापर माझ्याच माथी रोवलय मी



हा माझाच कसूर होता

कि सूर्याच्या घोड्यांशी शर्यत लावुन

मी आकाशात उडालो



जटायु माझ्या पेक्षा हुशार निघाला,

तो अर्ध्यातुनच मागे फिरला.



मी मात्र अहंकाराच्या गुर्मीत

उडत राहिलो.

आणि जसा सूर्याजवळ पोहचलो,

माझे पंख राख झाले.



मी पाणी मागितले

पण दूर आकाशी

पाणी कोण देणार?





सूर्याने मारलेल्याला

आपला शरणागत

कोण करतो?



आता तर सगळं सोडून

तुझ्या चरणी पडलो आहे.

मंदिराबाहेरच्या पायवाटेसमान

तुझ्याच अंगाणात चेतनाच्या शोधात अचेतन...



तुला काहीच दोष देत नाही ...

‘‘आमि आपन दोषे दुख पाइ

वासना-अनुगामी।’’



मुक्ता पाठक शर्मा
२८/५/२००९

Friday, September 3, 2010

अनिमा मुंडी (Anima Mundi)

.
.
.


उचल पावले फिर गरगर,
दारोदार नगर नगर.
नदी नाले वाहते निर्झर,
उंच उभ्या त्या गिरीवर.

चाल सरसर अथांग सरोवर.
या तनुवरुनी त्या तनुवर,
घेउनी पाठी सचेत कलेवर,
भटकत रहा या धरणीवर.

शोधीत रहा सदा निरंतर
क्षण क्षणिकांचे अंतर.
गळेल जेव्हा बाह्यांतर,
गुंजे एकनाद विश्वंभर.

Mukta