Monday, May 7, 2012

सारीपाट

सोळा शृंगार करून,
हलक्याच पावलानं माप ओलांडून,
चौसष्ट दालनात प्रवेश केला.

मन थरारलं !
श्वेतांबरा की कृष्णा ? मी कोण?
समोर दिसतय ते सत्य की आभास ?

एक आवाज दुमदुमला .....लढ !
जिंकायचे असेल तरी वा नसेल तरी....लढ !

का लढू ? कशासाठी ? कोणासाठी ?
मनात विचारांचे आढे वेढे,
नवखी मी , पाउल पडले नकळत पुढे.
एकच गदारोळ सुरू झाला.
हल्ला हल्ला गलका झाला.

मागे वळुन पाहिले,
सारे दरवाजे बंद !
चित्त भानावर ...
मी सत्य असत्याच्या पटावर .
जुनाच डाव नव्याने सुरू .
अग्निवेदि वरचा मंत्र घोष निनादु लागला,
"कार्येषु मंत्रि करणेशु दासी....."
शृंगाराचे शस्त्र केले,
शिल राखून वार केले.
कधी साधी सरळ चाल.
तर कधी अश्वारुढ वाटचाल.
कधी गजगामिनी,
तर कधी अनुगामिनी.

सपासप वार,
मरणालाही आनंदाची किनार !
मनात सलणारा जुना घाव,
एक चाल हारल्यावरही ,जिंकल्याचा आव !

झुंजत गेले ,लढत गेले.
सारे संपवून, जुन्या शल्याचे दमन केले...!


मुक्ता पाठक शर्मा..
 Thursday, 5 April 2012 at 23:21 

No comments:

Post a Comment